बॉलरने पायाने स्टंप उडवला पण तरी बॅट्समनला रनआउट दिले, IPL 2022 मधला सगळ्यात अतरंगी विकेट!

चुकून शंकरचा पाय स्टंपला लागला आणि स्टंप वरची एक बेल खाली पडली. पण दुसरी बेल मात्र अजूनही स्टंप वरच होती.


क्रिकेट म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचा खेळ. त्यात आयपीएल तर आपल्या गळ्यातला ताईतच झाला आहे.  मार्च महिना म्हटला की आयपीएलचा सिझन सुरू होतो. मार्चपासून सुरू झालेल्या या क्रिकेटच्या मॅच दोन महिने सर्वांना वेड लावून ठेवतात.

IPL २०२२ मध्ये तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, कोलकत्ता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, सनराईसर्स हैदराबाद या टीममध्ये चुरशीची लढत रंगली आणि गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन टीमने तर त्यात अजूनच बहार आणली.

Source: dnaindia.com

ह्या आयपीएलमध्ये पदार्पण केलेली टीम गुजरात टायटन्सने २०२२ चा हा सिझन खूप गाजवला. नवीन टीम असून सुद्धा प्रत्येक सामन्यात त्यांचा खेळ जबरदस्त होत होता.

गुजरात टायटन्स टीमच्या IPL २०२२ मधील दिल्ली विरुद्धचा दुसरा सामना हा अधिक जास्त रंगला आणि त्या सामन्याची सगळीकडे चर्चा झाली. हा सामना गुजरातने जिंकला आणि क्रिकेट इतिहासातील एका अनोख्या क्षणाचा साक्षीदार सुद्धा ठरला. तो क्षण म्हणजे दिल्लीचा फलंदाज ललित यादवचा दुर्मिळ रनआउट!

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या मॅचमध्ये ललित यादवने एकदम कमालीची खेळी केली होती. या मॅचमध्ये यादवने ४८ धावांवर नाबाद राहून मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवण्यात मोलाचे योगदान दिले होते. दुर्दैवाने, तो दुसऱ्या मॅचमध्ये याची पूनरावृत्ती करू शकला नाही. केवळ २५ धावा करत या मॅचमध्ये तो अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने रन आउट झाला.

दिल्ली कॅपिटल्सच्या ललित यादवसोबत गमतीदार किस्सा असा घडला की, गुजरात टायटन्स संघाचा बॉलर विजय शंकर बॅट्समन रिषभ पंतला १२ व्या ओव्हरला बॉलिंग टाकत होता. रिषभ पंतने चेंडू लेग- साईडला फटकावला आणि तो व ललित यादव दोघेही धाव घेण्यासाठी धावू लागले.

याचदरम्यान शंकरच्या हातात बॉल आला. ललित यादव वेगाने आपली धाव पूर्ण करण्याच्या तयारीत होता, याचवेळी चुकून शंकरचा पाय स्टंपला लागला आणि स्टंप वरची एक बेल खाली पडली. पण दुसरी बेल मात्र अजूनही स्टंप वरच होती. तेवढ्यात शंकरच्या हातात थ्रो आला आणि त्याने लागलीच चेंडू लागत स्टंप उडवला. दुर्दैवाने ललित यादव क्रीझमध्ये वेळेत पोहोचला नाही आणि रनआउट झाला.

क्रिकेटच्या इतिहासात अशा प्रकारे कोणीच रनआउट झालेले नाही. म्हणजे बॉलरचा पाय लागून स्टंप उडाला आहे आणि तरी बॉलरने फलंदाजाला पुन्हा रनआउट केले.

अम्पायरने आउट दिलेले पाहून दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंत मात्र चिडला आणि पाय आधीच लागलेला असताना विकेट कसा काय दिला जाऊ शकतो असा सवाल त्याने केला. तेव्हा अम्पायरने त्याला नियम समजावत सांगितले की बॉलरचा पाय स्टंपला लागल्यावर तो फाउल असतो पण त्यासाठी स्टंपवरच्या दोन्ही बेल्स खाली पडल्या पाहिजेत. इथे विजय शंकरचा पाय लागून एक बेल खाली पडली आणि दुसरी बेल त्याने चेंडू लावून उडवली, त्यामुळे क्रिकेट नियमांनुसार ललित यादव आउट आहे!

अर्थात हे उत्तर ऐकूनही रिषभ पंतचे समाधान झाले नाही, पण म्हणतात ना क्रिकेट मध्ये पंचाचा निर्णय अंतिम, त्यामुळे तो सुद्धा काही करू शकला नाही आणि एक दुर्मिळ रनआउट ललित यादवच्या नावे नोंद झाला.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav